नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे शनिवारी निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लखनऊ मधील एसजीपीजीआय रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांना ४ जुलै रोजी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
दोनवेळा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि राजस्थान व हिमाचल प्रदेशचे राज्यपाल देखील राहिले आहेत. कल्याण सिंह यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. राम मंदिर आंदोलनातील ते भाजपचे एक प्रमुख नेते होते.
कल्याण सिंह यांचा जन्म ५ जानेवारी १९३२ रोजी झाला होता. ते १९९१ मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर १९९७-९९ या काळातही ते मुख्यमंत्री राहीले. उत्तर प्रदेशच्या राजकारणात हिंदुत्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. २००९मध्ये त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. तर, २६ ऑगस्ट २०१४ मध्ये ते राजस्थानचे राज्यपाल बनले होते. १९९९ मध्ये भाजप सोडल्यानंतर त्यांनी २००४मध्ये पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर ते बुलंदशहर येथून भाजपचे खासदार बनले, त्यानंतर २००९ मध्ये अपक्ष खासदार देखील बनले होते. २०१० मध्ये कल्याण सिंह यांनी आपली स्वतंत्र जन क्रांती पार्टी तयार केली.