ठरलं…  94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार
बातमी महाराष्ट्र

ठरलं… 94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार

यावर्षीच ९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मार्च महिन्याच्या अखेरीस नाशिक येथे हे संमेलन होणार आहे. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी आज औरंगाबादमध्ये ही घोषणा केली. नाशिककरांशी चर्चा करून संमेलनाच्या तारखा निश्चित केल्या जातील, तसेच, या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची घोषणा 24 जानेवारीला करण्यात येईल. असंही त्यांनी सांगितलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनाची परिस्थिती निवळल्यामुळे साहित्य संमेलन भरवण्याबाबतचा निर्णय महामंडळाने घेतल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं. यावेळी बोलताना ठाले-पाटील म्हणाले की, ”कोरोनाचं संकट येण्यापूर्वीच परभणी जिल्ह्यातील सेलू, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, नाशिक आणि पुण्याच्या सरहद संस्थेकडून राजधानी नवी दिल्लीत संमेलन घेण्याविषयीचे प्रस्ताव महामंडळाकडे आला होता. पुण्याच्या ‘सरहद्द’ संस्थेनं फेर निमंत्रण पाठवलं होतं. त्यात मे महिन्यात दिल्लीत संमेलन घेण्याची मागणी केली होती.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला व्हावे, अशी मागणी सरहद्द संस्थेचे निमंत्रक संजय नहार यांनी केली होती. त्यांच्या मागणीचा आदर करून दिल्लीकरांसाठी एक ‘विशेष’ साहित्य संमेलन घेण्याचा विचार महामंडळ करील, असं नहार यांना सुचवण्यात आलं होतं. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनीही तसा प्रस्ताव दिला होता. मात्र, संजय नहार यांनी महामंडळाचा हा प्रस्ताव नाकारला, अशी माहिती ठाले-पाटील यांनी दिली.

महामंडळाने नाशिकमधील लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारले होते. त्यानंतर साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीनं नुकतीच या संस्थेला भेट दिली. समितीच्या सदस्यांनी जागेची पाहणी करून आपला अहवाल महामंडळाला सादर केला. त्यावर विचारविनिमय झाल्यानंतर आज स्थळ निश्चितीची घोषणा करण्यात आली.