राज्यपालांचं शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य, वाद तापला, शिंदे-फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
राजकारण

राज्यपालांचं शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य, वाद तापला, शिंदे-फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई: वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राज्यातील वातावरण कमालीचे तापले आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आणि अनेक लोक भाजपवर तुटून पडले आहेत. अलीकडे भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक वाढलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (मनसे) भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे सध्या शिंदे फडणवीस सरकारची प्रचंड कोंडी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही नेते लवकरच राजभवनात जाऊन राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता या बैठकीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली. राज्यपालांनी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह उद्गार काढल्याबद्दल उदय सामंत यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी उदय सामंत यांनी म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत लवकरच राज्यपाल कोश्यारी यांच्याशी चर्चा करणार आहेत. आम्ही सगळेजण शिवरायांचा आदर करणारे आहोत. शिवाजी महाराजांविषयी प्रत्येकाने आदराने बोलले पाहिजे, हीच आमची भूमिका असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यपालांकडे जाऊन काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य संघटनांनी रस्त्यावर उतरून कोश्यारींचा जोरदार निषेध केला. याबाबत अद्याप एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवरील दबाव वाढला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेमकं काय म्हणाले?

“आम्ही जेव्हा शाळेत जायचो, तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे, तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. महाराष्ट्र नवरत्नांची खाण आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील.”