गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी : रामचंद्र गुहा
राजकारण

गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी : रामचंद्र गुहा

नवी दिल्ली : ”गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी. मोदी, शाह आणि नड्डा हे भाजपाचे तिन्ही प्रमुख नेते एकमेकांशी वैचारिक पातळीवर जोडलेले आहेत. या तिघांनाही राजकारण हे वारसा म्हणून मिळालेलं नाही. या तिघांमध्येही हिंदुत्वावर आधारित राजकारण पुढे घेऊन जाण्याची ताकद असून सध्या ते तेच करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसची परिस्थिती उलट असून तिथे तिन्ही मोठे नेते वैचारिक पातळीवर एकमेकांशी जोडलेले दिसत नाहीत. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत कारण त्यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे, असं रोखठोक मत ज्येष्ठ लेखक आणि प्रसिद्ध इतिहासकार असणाऱ्या रामचंद्र गुहा यांनी आपल्या एका लेखामध्ये व्यक्त केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गुहा यांनी एनडीटीव्हीच्या वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात व्यक्त हे केलं आहे. गांधींनी आता जाणं गरजेचे का आहे, या मथळ्याखाली गुहा यांनी हा लेख लिहिला आहे. त्याचबरोबर गुहा यांनी आपल्या या लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांचाही उल्लेख केला आहे.

गांधींनी पक्ष सोडावा
गुहा यांनी आपल्या लेखात स्पष्टपणे गांधी कुटुंबाने केवळ काँग्रेसच्या प्रमुख नेतृत्वावरुनच नाही तर पक्षापासूनच दूर जाण्याची गरज असल्याचे संकेत दिलेत. मात्र त्याचबरोबर, पुढील लोकसभा निवडणुकींसाठी अजूनही तीन वर्षे बाकी आहेत. या कालावधीमध्ये काँग्रेसने स्वत:ला पुन्हा उभं केलं पाहिजे. भविष्यातील नेतृत्व पक्षबांधणीच्या माध्यमातून समोर आणलं पाहिजे. इतर विरोधी पक्षांना एकत्र घेऊन आघाडी स्थापन करुन कणखर पर्याय निर्माण केला पाहिजे, असं गुहा यांनी म्हटलं आहे.

बिहार निवडणुक
राहुल गांधी हे राजकारणासंदर्भात किती गंभीर आहेत हे सांगताना रामचंद्र गुहा यांनी बिहार निवडणुकीचे उदाहरण दिलं आहे. निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये राहुल गांधी सुट्ट्यांसाठी निघून गेले होते. तर, याच निवडणूक काळात ‘काँग्रेसच्या उलट भाजपाने निवडणूक जिंकल्यानंतर लगेच अध्यक्ष असणारे जे. पी. नड्डा हे अशा ठिकाणी दौरा करण्याची घोषणा केली जिथे पक्षाने वाईट कामगिरी केली आहे.” असे म्हणत त्यांनी भाजपा’चे कौतुकही केले आहे.

विचारसरणीतील फरक
“मी ज्या काँग्रेसचा समर्थक होतो ती महात्मा गांधीची काँग्रेस आहे. त्या काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवू देत देशामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या मुल्यांची जोपासना करण्याला प्राधान्य दिलं होतं. मात्र आज काँग्रेस स्वत:ला स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणवते आणि दुसरीकडे मवाळ हिंदुत्वाचे धोरण अवलंबताना दिसत आहे,” असा टोला काँग्रेसला लगावला आहे. याच लेखात गुहा यांनी भाजपा आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या विचारसरणीमध्ये मोठा फरक असल्याचंही निरिक्षण नोंदवलं आहे.

कॉंग्रेस आणि भाजपा मधील फरक
काँग्रेस एकीकडे आपण उदारमतवादी असल्याचे सांगत त्याचे श्रेय घेते. तस दुसऱ्या दिवशी ते उद्योजकांना विरोध करताना दिसतात. तर दुसरीकडे भाजपाचे नेतृत्व हे सेल्फ मेड म्हणजेच स्वत: घडवलेलं नेतृत्व आहे. ते वैचारिक स्तरावर एका पातळीवर आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते कोणत्याही मोठ्या कुटुंबातून आलेले नाहीत. असा मोठा फरक काँग्रेस आणि भाजपाच्या नेतृत्वामध्ये दिसून येतो