नारायण राणेंच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे; पवारांचा राणेंना टोला
राजकारण

नारायण राणेंच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे; पवारांचा राणेंना टोला

पुणे : “नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत. पण ते असे विनोद करतात, हे मला माहिती नव्हते. त्यांच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे. त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही”, असा खोचक टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पायगुणामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावे आणि चांगले सरकार यावे, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते. याच वक्तव्याचा शरद पवार यांनी समाचार घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बारामती येथे एका कार्यक्रमानंतर शरद पवार प्रसार माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहे. नारायण राणे यांच्या पडवे मेडिकल कॉलेजचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांच्यासह भाजपाचे अनेक नेते उपस्थित आहेत.

तर दुसरीकडे दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरूनही शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “शेतकरी आंदोलनाचे गांभीर्य केंद्र सरकारला कळायला हवे. शेतकऱ्यांची अस्वस्था पाहून केंद्र सरकार मधील वरिष्ठ मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालयला हवे होते. मात्र शेतकऱ्यांशी चर्चा करणारे रेल्वे मंत्री पीयूष गोयल काही कृषि तज्ज्ञ नाहीत. गोयल माझे चांगले मित्र आहेत. मात्र ते शेतीतज्ज्ञ आहेत, हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली, अशी कोपरखळी शरद पवार यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना मारली.