पंतप्रधान मोदीचं ममता सरकारवर टीकास्त्र; ममता दीदींनी बंगालचा विश्वासघात केला
राजकारण

पंतप्रधान मोदीचं ममता सरकारवर टीकास्त्र; ममता दीदींनी बंगालचा विश्वासघात केला

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून मतदान 27 मार्चपासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा कोलकातातील ब्रिगेड मैदानावर पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेससह डावे पक्ष आणि काँग्रेसवर निशाणा साधला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

”बंगालने परिवर्तनासाठीच ममता दीदींवर विश्वास ठेवला. पण, दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्वासघात केला. या लोकांनी बंगालचा विश्वास तोडला. या लोकांनी बंगालला अपमानित केलं. मुलींवर अत्याचार केले,” अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी ममता सरकारवर टीकास्त्र डागलं.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत एका बाजूला तृणमूल काँग्रेस, डावे आणि काँग्रेस, त्यांचा बंगाल विरोधी वागणूक आहे. तर दुसऱ्या बाजूला बंगालची जनता पाय रोवून उभी आहे. ब्रिगेड मैदानावरील जनतेचा आवाज ऐकल्यानंतर कुणालाही शंका राहणार नाही. बंगालने परिवर्तनासाठी ममता दीदींवर विश्वास टाकला होता. पण, दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंगालचा विश्वासघात केला. या लोकांनी बंगालला अपमानित केलं. इथल्या बहिणी आणि मुलींवर अत्याचार केले,” असंही मोदी म्हणाले.

“बंगालमध्ये जन्म घेतलेल्या महान व्यक्तींनी एक भारत, श्रेष्ठ भारत ही भावना बळकट केली. बंगालच्या याच भूमीने एक संविधान, एक निशान, एक पंतप्रधान यासाठी बलिदान देणारा पूत्र दिला. अशा पवित्र भूमीला मी नमन करतो. या भूमीने संस्काराची ऊर्जा दिली. या भूमीने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राण फुंकले. बंगालच्या या भूमीने ज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात भारताची मान उंचावली. त्याच बंगालला ममता बॅनर्जी यांनी धोका दिला,” अशी टीका मोदी यांनी केली.

“मी तुम्हाला विश्वास देण्यासाठी आलोय. विश्वास बंगालच्या विकासाचा. बंगालमधील परिस्थिती बदलण्याचा. बंगालमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा. बंगालचं पुनर्निर्माण करण्याचा. विश्वास बंगालच्या संस्कृती रक्षणाचा. मी ग्वाही देतो इथल्या तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी, इथल्या भगिनी आणि मुलींच्या विकासासाठी आम्ही २४ तास काम करू. कष्ट करण्यात कोणताही कुचराई करणार नाही,” असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, बंगालमध्ये 294 जागांसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. 27 मार्च रोजी बंगलामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 38 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी 1 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यांत 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 6 एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून 31 जागांसाठी मतदान केलं जाणार आहे.