ग्रामपंचायत निवडणुक निकाल: मंत्री आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; शहरांपासून गावांपर्यंत….
राजकारण

ग्रामपंचायत निवडणुक निकाल: मंत्री आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; शहरांपासून गावांपर्यंत….

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झाला, अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुक मतदानाचे निकाल हाती येत असून अनेक ठिकाणी शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये कडवी टक्कर पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीही ग्रामीण भागातील आपला जनाधार कायम राखताना दिसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ग्रामपंचायतीच्या निकालात महाविकास आघाडीतल शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुरस्कृत पॅनेलला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. ग्रामपंचायतीच्या या निकालांवर प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे की, शहरांपासून गावांपर्यंत लोकांचा या सरकारवर विश्वास आहे. कोराना काळात सरकारने परिस्थिती कशी हाताळली आहे, हे लोकांनी बघितलं आहे. पर्यावरणाचा समतोल राखत विकास करत आहोत.”

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील निवडणुकांच्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समाधानकारक आहेत. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आपापले प्राबल्य असलेल्या ठिकाणी चांगली कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. तसेच, निवडून आलेल्या सदस्यांना विकास कामांसाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासनही अजित पवारांनी यावेळी दिलं.

दरम्यान, राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज हाती येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील मतमोजणी सुरू असून आतापर्यंत भाजपाने ६७८, शिवसेनेनं ७१४, राष्ट्रवादीने ५७८, काँग्रेसने ५२० तर मनसेने १४ ग्रामपंचायतींवर विजय मिळवलेला आहे. तसंच अपक्षांनीही ८५८ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. या निवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ७९ टक्के मतदान झाले होते. आज मतमोजणीला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. या निकालाची आता लाखो उमेदवारांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे.