सुरक्षा कमी केल्याने माझ्या फिरण्यावर काहीही फरक पडणार नाही 
राजकारण

सुरक्षा कमी केल्याने माझ्या फिरण्यावर काहीही फरक पडणार नाही 

मुंबई : ”मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा सुरक्षा घेतली. मी भाजप प्रदेश अध्यक्ष होतो त्यावेळीही सुरक्षा घेतली नव्हती. याकूब मेननच्या फाशीनंतर आणि नक्षलवादी कारवायांनंतर केंद्राच्या सांगण्यावरुन माझी सुरक्षा वाढवण्यात आली होती. या सरकारला असं वाटत असेल की आता सुरक्षेची गरज नाही. मला सुरक्षेची गरज नाही, मी फिरत राहणार. परसेप्शनवर सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला जातो. मला चिंता नाही, आता राजकीय निर्णय केले जात आहेत. माझी कुठलीही तक्रार नाही, मी जनतेतला माणूस आहे, त्यामुळं माझ्या फिरण्यावर काहीही फरक पडणार नाही,” अशी खरमरीत प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील भाजपा नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेत भाजपाला चांगलाच धक्का दिला आहे.  विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढण्यात आली असून त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढण्यात येणार आहे. तर वकील उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दर एक ते दोन महिन्यांमध्ये  सिक्युरिटी रिव्ह्यू मिटींग होते. कोविड काळात पोलिसांवर खूप ताण आलेला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचा नेत्यांचा सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर अनेक भाजपा नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.  माजी मुख्यमंत्री नारायण राणे, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजपा नेते  सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे की, सुरक्षा काढली याबद्दल सरकारचे धन्यवाद पण लोकांच्या सुरक्षेसाठी आमचा आवाज बंद होणार नाही. चंद्रपूर हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे आणि दारूबंदीमुळे मला ज्या धमक्या मिळत होत्या त्यासाठी सुरक्षा दिली होती. सुरक्षा एक एक ग्रेडने कमी केली जाते पण सरकारने एकदम शून्य केली. सरकारला मनापासून धन्यवाद की राज्य एकदम सुरक्षित आहे म्हणून ही सुरक्षा काढली, असा टोला भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. हा निर्णय पूर्णपणे राजकीय आहे आणि याची नोंद तुम्ही ठेवा, सरकार येतं आणि जातं. आम्हाला स्वतःच्या सुरक्षेची चिंता नाही तर लोकांच्या सुरक्षेसाठी आमचा आवाज अजून धारधार होईल, असं ते म्हणाले.