भाजप करणार काँग्रेसला सहकार्य; उमेदवाराने घेतली माघार
राजकारण

भाजप करणार काँग्रेसला सहकार्य; उमेदवाराने घेतली माघार

नवी दिल्ली : राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपने या निवडणुकीसाठी संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. मात्र, महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देत भाजप काँग्रेसला सहकार्य करणार आहे. यासाठी भाजपाचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे, याचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी चर्चेत केला. काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाचा विचार करून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी विचारविनिमय केला आणि भाजपने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसेच राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांचे अभिनंदन केले.

रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष भाजपाला महाराष्ट्राच्या परंपरेचा दाखला देत म्हटलं होतं की, आत्तापर्यंतची महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की जेव्हा निधनासारखी दुर्दैवा घटना घडते, तेव्हा आपण निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करून बिनविरोध निवडणूक करतो. पण मला खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून त्यांची काही भूमिका असली, तरी ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील आणि निवडणूक बिनविरोध करतील. यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत.