संजय राठोड नॉट रिचेबल नाहीत; अजित पवारांचे स्पष्टीकरण
राजकारण

संजय राठोड नॉट रिचेबल नाहीत; अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन राज्यातील राजकारणात ढवळून निघाले आहे. अशातच या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अशातच संजय राठोड नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा सुरु होत्या. परंतु, संजय राठोड गायब नसून संपर्कात असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. संजय राठोड यांच्याबाबत अजित पवार यांनी माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, ”मला अशी माहिती मिळाली की, गुरुवारी ते याप्रकरणी खुलासा करणार आहेत. माझा आणि त्यांचा काही संपर्क झालेला नाही. पण त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्यासंदर्भात आम्ही स्वतः सांगितलं, राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं की, कोणावरही काही आरोप करण्यात आले तर त्याची रितसर चौकशी झाली पाहिजे, त्या प्रकरणाची चौकशी सध्या पुणे पोलीस करत आहेत. याप्रकरणी काही लोकांना अटकही करण्यात आलेली आहे. पण जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत निष्पाप व्यक्तीचं नाव घेऊन कारण नसताना त्यांना संशयाच्या भोवऱ्यात टाकणं हे फार उचित नाही.”

तसेच, ”आज या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे आणखी एक-दोन जणांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. चौकशी नंतर सगळं स्पष्ट होईल. याच्यात कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही ती कुणीही व्यक्ती असो. पण चौकशी होऊन, संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत एखाद्याला दोषी ठरवायचं किंवा एखाद्याला त्या पदावरून हटवायचं हे पण कितपत योग्य आहे? हा विचार करण्यासारखा भाग आहे. अर्थात ते शिवसेनेचे एख नेते आहेत आणि त्याबद्दल काय करायचं हे शिवसेनाच भूमिका घेऊ शकते. पण माझं स्वतःचं मत आहे की, जोपर्यंत चौकशीचा अंतिम अहवला येत नाही. तोपर्यंत थोडा संयम ठेवणं महत्वाचं आहे.” असंही यावेळी अजित पवार यांनी बोलून दाखवलं.

विशेष म्हणजे, ”काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या बाबतीतही असंच झालं. वास्तविक राजकीय क्षेत्रात अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारी ती व्यक्ती आहे. यासंदर्भात ज्या मुलीबाबत ही घटना घडलेली आहे. तिनं आत्महत्या केली असं सांगितलं जात आहे. चौकशीमध्ये खरं काय आहे ते पुढे येईल. पण तिच्या वडीलांचं स्टेटमेंट मी स्वतः टीव्हीवर पाहिलं. पण वडीलांनी सांगितलं की, आमच्यावर कर्ज झालं होतं. तिने पोल्ट्रि व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न केला पण, दुर्दैवानं बर्ड फ्लू आणि कोरोनामुळे तो व्यवसाय अडचणीत आला.”