ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली म्हणून इथपर्यंत आलो…
राजकारण

ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली म्हणून इथपर्यंत आलो…

नवी मुंबई : “मी ५० वर्षांपासून राजकारणात काम करतोय. ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली म्हणून इथपर्यंत येता आलं,” असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेचे आभार मानले. तसेच कार्यकर्त्यांना फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची पिढी घडवण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केले. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सभागृहात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, “जागृत राहून समाजकारण करण्याची संकल्पना राबवली पाहिजे. मी ५० वर्षांपासून राजकारणात काम करतोय. ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली म्हणून इथपर्यंत येता आलं. माणसाला वय मिळतं. वाढतं जातं. जी विचारधारा आपण स्वीकारली. जे सूत्र स्वीकारलं त्या मार्गानं जाण्याचं काम करायचं असतं. सार्वजनिक जीवनात आपण सगळे काम करतो. शेवटच्या माणसाच्या हितासाठी तुम्ही लक्ष देता, तेव्हा तिथं तुम्हाला समजतं, पुढचा रस्ता कोणता असला पाहिजे ही स्पष्टता येते. असं शरद पवार म्हणाले.

“आज या देशाला भक्कम व्यवस्था बाबासाहेबांनी दिली. पण, त्यांनी इतरही क्षेत्रातही योगदान दिलं. ब्रिटीश सरकारनं नेमलेल्या सरकारमध्ये बाबासाहेबांकडे पाण्याचं खातं होतं. भाक्रा-नांगल धरणाच्या माध्यमातून अन्नधान्याचा प्रश्न सोडण्यास मदत झाली पाहिजे. पाण्यापासून वीज निर्माण केली पाहिजे. बाबासाहेबांनी विज्ञानाचा आधार केला. त्या विचारांची पिढी तयार करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे,” असं शरद पवार म्हणाले.

पवार पुढे म्हणाले, “अनेकांनी फुले-आंबेडकरांचा उल्लेख केला. सगळ्यांनी आपल्या नेतृत्वातून दृष्टी दिली. आज त्यांच्या नावाचा उल्लेख करून चालणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधी-नेहरू विचारांची पताका घेऊन काम केलं पाहिजे हे त्या मातेनं स्वीकारलं आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. तिचा दृष्टिकोण आम्हाला महत्त्वाचा ठरला. त्यांनी दिलेल्या दृष्टीतून समाज मानसिकता तयार करण्याची जबाबदारी घ्यावी लागले,” असं आवाहन शरद पवार यांनी केलं.