पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगालाच घेऊ द्या, शिंदे गट एवढा हट्टाला का पेटलाय? वाचा २ कारणं
राजकारण

पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगालाच घेऊ द्या, शिंदे गट एवढा हट्टाला का पेटलाय? वाचा २ कारणं

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना विरुद्ध शिंदे गटाच्या सुनावणीचा निकाल आणखी लांबणीवर पडला आहे. शिंदे गटाने नुकतीच एक याचिका दाखल केली होती. यामध्ये निवडणूक आयोगाच्या अखत्यारित येणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी शिंदे गटाने (Eknath Shinde Camp) केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने २७ सप्टेंबरपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या झटपट निकाल लावण्याच्या अपेक्षा तुर्तास तरी धुळीस मिळाल्या आहेत. (Shivsena vs Eknath Shinde camp hearing in SC)

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र, या सगळ्यामुळे शिंदे गट निवडणूक आयोगाच्या माध्यमातून धनुष्यबाण या चिन्हाचा निर्णय लावण्यासाठी इतका आटापिटा का करत आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यासाठी दोन प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. एक म्हणजे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेली अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. शिवसेनेने या मतदारसंघातून दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना रिंगणात उतरवण्याचे ठरवले आहे. ऋतुजा लटके या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढल्यास त्यांना फायदा होऊ शकतो. याशिवाय, सहानुभूतीचा फॅक्टर ऋतुजा लटके यांच्या बाजूने असेल. अशावेळी शिंदे गटाला आपला उमेदवार निवडून आणणे जवळपास अशक्यप्राय ठरेल. त्यामुळे या निवडणुकीआधी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून धनुष्यबाण हे चिन्ह आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे गट प्रयत्नशील असल्याचे सांगितले जाते.

याशिवाय, राज्यातील प्रमुख महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही काही महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपल्या आहेत. भाजपने या सगळ्या निवडणुकांची फार पूर्वीपासूनच तयारी केली आहे. याउलट शिंदे गटाचे भविष्यातील अस्तित्त्व पूर्णपणे न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारी फोडले असले तरी शिंदे गटाला तांत्रिकदृष्ट्या आणि औपचारिकरित्या शिवसेना म्हणून मान्यता मिळालेली नाही. सत्तेत असल्याने राज्यातील संपूर्ण यंत्रणा शिंदे गटाच्या हाताशी असली तरी प्रत्यक्ष निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह निर्णायक भूमिका वठवू शकते. कारण, मतदारांमध्ये अद्याप खरी शिवसेना कोणाची याबाबत संभ्रम आहे. अशावेळी मतदार धनु्ष्यबाण या चिन्हाशी नाळ जोडली गेली असल्याने त्यांच्याच पारड्यात मत टाकतील, अशी शक्यता अधिक आहे.

तसेच शिंदे गटआणि भाजपकडून एकनाथ शिंदे हेच कसे बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेणारे आहेत, हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला जात असला तरी जनतेच्या मनाला हे कितपत पटेल, याची अद्याप शाश्वती नाही. आतापर्यंत इतका सगळा आटापिटा करून धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या गटाकडेच राहिले तर खरी शिवसेना ही आपलीच आहे, हा एकनाथ शिंदे यांचा दावा एकप्रकारे फोल ठरेल. त्यानंतर शिंदे गटाला कदाचित भाजपमध्ये विलीन व्हावे लागेल. त्यामुळे शिंदे गटाची स्वतंत्र ओळखच पुसली जाण्याचाही धोका आहे. या सगळ्यामुळे शिंदे गटाला निवडणूक आयोग आपल्याला अनुकूल निर्णय देईल, या अपेक्षेने झटपट निर्णयासाठी आग्रही असल्याचे सांगितले जाते.