नवी दिल्ली : भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने कर्णधार विराट कोहलीवर टीका केली आहे. गंभीरने विराटच्या कर्णधारपदाच्या शैलीवरच टीका केली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
मला विराटची कॅप्टन्सी खरंच समजत नाही. ऑस्ट्रेलियासारख्या संघावर नियंत्रण मिळवायचं असेल तर सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट मिळवणं गरजेचं आहे याबद्दल आपण नेहमी बोलत असतो. अशावेळीही तुम्ही तुमच्या महत्वाच्या गोलंदाजाला फक्त दोन षटकं देता? सर्वसाधारणपणे वन-डे क्रिकेमध्ये जलदगती गोलंदाज ४-३-३ च्या हिशोबाने स्पेल टाकतात. पण तुम्ही जर संघातल्या महत्वाच्या गोलंदाजाला केवळ दोन षटकं देऊन थांबवणार असाल तर खरंच विराटची कॅप्टन्सी न समजणारीच आहे. हे टी-२० क्रिकेट नाही, असं गंभीरने म्हटले आहे.
सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघावर ५१ धावांनी मात करुन ऑस्ट्रेलियाने वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. सिडनीच्या मैदानावर ३९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ ३३८ धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताकडून विराट कोहली, लोकेश राहुल आणि अन्य फलंदाजांनी चांगले प्रयत्न केले. परंतू अपेक्षित धावगती कायम न राखल्यामुळे टीम इंडियाला ३९० धावांचं डोंगराएवढं आव्हान झेपवलं नाही.