नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय संघाचा ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विन आणि अनुभवी महिला क्रिकेटपटू मिताली राज यांच्या नावांची शिफारस केली आहे. त्याचबरोबर अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांची नावे देण्यात आली आहेत.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
बीसीसीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आमची सविस्तर चर्चा झाली आणि अश्विन आणि मिताली राज यांची नावे खेलरत्नसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवनची शिफारस करत आहोत. तर, या पुरस्कारासाठी केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांची नावेही दिली आहेत.
मितालीने गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२ वर्षे पूर्ण केली. ३८ वर्षीय मिताली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सात हजाराहून अधिक धावा करणारी यशस्वी फलंदाज आहे. मितालीप्रमाणेच अर्जुन पुरस्कार जिंकणार्या अश्विननेही कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याने ७९ कसोटी सामन्यांत ४१३ बळी घेण्याव्यतिरिक्त वनडे आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अनुक्रमे १५० आणि ४२ बळी घेतले आहेत.