कोरोना काळात उद्योग क्षेत्राला मोठा फटका; ११ महिन्यात दहा हजाराहून अधिक कंपन्यां बंद
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना काळात उद्योग क्षेत्राला मोठा फटका; ११ महिन्यात दहा हजाराहून अधिक कंपन्यां बंद

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरात कोरोना महामारीचे अनेक दुष्परिणाम झाल्याचे आपण पहिले आहेत. एकूणच कोरोनाचा प्रत्येक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. याचा सर्वाधिक फटका बसला तो उद्योग क्षेत्राला. कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) याबाबत नुकतीच एक आकडेवारीनुसार प्रसिध्द केली आहे. या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील दहा हजार ११३ कंपन्या बंद झाल्यात.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपन्या बंद होण्यामागील सर्वात मोठं कारण हे देशात लागू करण्यात आलेला लॉकडाउन. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २०२० च्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशभरामध्ये लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यामुळेच कंपन्यांना सर्व नियमांचे पालन करुन मे महिन्यापासून हळूहळू काम करण्यास सुरुवात करावी लागली. या लॉकडाउनमुळे कंपन्यांना मोठं नुकसान झालं. त्यामुळेच हजारो कंपन्यांनी आपला कारभार बंद केला.

कंपनी व्यवहार मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षामध्ये कंपनी अधिनियमांतर्गत एकूण १० हजार ११३ कंपन्यांना बंद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या कंपन्यांविरोधात सरकारने कोणतीही दंडात्मक कारवाई करुन त्या बंद न करता कंपन्यांनी स्वत:हून आपले उद्योगधंदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी सर्वाधिक कंपन्या बंद झालेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचाही समावेश आहे.

लॉकडाउनमुळे देशातील आर्थिक व्यवहारांना खूप मोठा फटका बसला. त्यामुळेच अनेक कंपन्या बंद करण्यात आल्याचे समोर आले आहे. सोमवारी लोकसभेमध्ये यासंदर्भात विचारण्यात आले असता कंपनी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी याला लेखी उत्तर दिले. या उत्तरानुसार, वर्ष २०२०-२१ मध्ये कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २४८ (२) अंतर्गत एकूण १० हजार ११३ कंपन्यांना बंद करण्यात आल्या. मात्र ज्या कंपन्या आपल्या व्यवसायामधून बाहेर पडल्या आहेत त्यांची आकडेवारी मंत्रालयाकडे उपलब्ध नसते. मंत्रालयाने कंपन्यांविरोधात कारवाई केल्याने त्या बंद करण्यात आलेल्या नाहीत, असं अनुराग सिंह ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

त्याचबरोबर, कंपनी व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये सर्वाधिक म्हणजेच दोन हजार ३९४ कंपन्या बंद पडल्या. त्या खालोखाल उत्तर प्रदेशमध्ये एक हजार ९३६ कंपन्या बंद पडल्या. सर्वाधिक कंपन्या बंद पडलेल्या राज्यांच्या यादीमध्ये तामिळनाडू १३२२ कंपन्या), महाराष्ट्र (१२७९ कंपन्या) आणि कर्नाटक (८३६ कंपन्या) या तीन राज्यांचा अव्वल पाच राज्यांच्या यादीत समावेश आहे.

त्याचबरोबर चंडीगड आणि राजस्थानमध्ये प्रत्येक ४७९ कंपन्या, तेलंगणामध्ये ४०४ कंपन्या, केरळमध्ये ३०७ कंपन्या बंद पडल्या आहेत. याचप्रमाणे झारखंडमधील १३७ कंपन्यांना, मध्य प्रदेशमधील १११ कंपन्यांना आणि बिहारमधील १०४ कंपन्यांना एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये टाळं लागलं. इतर राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांबद्दल बोलायचं झाल्यास मेघालयमध्ये ८८, ओडीसामध्ये ७८, छत्तीसगडमध्ये ४७, गोव्यात ३६, पुद्दुचेरीमध्ये ३१, गुजरातमध्ये १७, पश्चिम बंगालमध्ये चार तर अंदमान निकोबारमध्ये केवळ दोन कंपन्या बंद झाल्यात.