कोरोना लस घेतल्यानंतर तीन परिचारिकांना त्रास; आयसीयु’मध्ये उपचार सुरु
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना लस घेतल्यानंतर तीन परिचारिकांना त्रास; आयसीयु’मध्ये उपचार सुरु

अहमदनगर : राज्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरवात झाली. त्यानंतर कोणालाही लसीचा दुष्परिणाम झाल्याचे समोर आले नाही. मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, काल कोरोनाची लस घेतल्यानंतर नगरमध्ये तीन परिचरिकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी लस घेतल्यानंतर या परिचारिकांना थंडी, ताप, डोकेदुखी, थकवा, मळमळ, उलट्या, चक्कर येणे असे त्रास होऊ लागला. त्यामळे त्यांना रात्रीच जिल्हा रुग्णलयात दाखल करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या दोन व महापालिका रुग्णालयाच्या एका परिचारिकेचा यात समावेश आहे. अशा रुग्णांसाठी तेथे १२ खाटांचा खास कक्ष सुरू करण्यात आला आहे. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

दरम्यान, कालपासून देशभरात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ झाला. राज्यातील विविध जिल्ह्यांत आरोग्यसेवकांना प्राधान्यानं लस देण्यात आली. इतर जिल्ह्यांप्रमाणेच नगर जिल्ह्यात १२ केंद्रावर लसीकरण करण्यात आले. पहिल्या दिवशी १२०० जणांना लस देण्यात येणार होती. प्रत्यक्षात ८७१ जणांनी उपस्थित राहून लस घेतली. लसीकरणानंतर संबंधितांना अर्धा तास केंद्रावर ठेवल्यानंतर घरी सोडण्यात आले. लस घेतलेल्यांपैकी दोघींना रात्री तर एकीला सकाळी त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात आणण्यात आले.

तथापि, राज्यातील इतर कोणत्या जिल्ह्यातून लसीचे दुष्परिणाम झाल्याची माहिती समोर आली नाहीये. तरीही लस घेतलेल्या अन्य कर्मचाऱ्यांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे.