भारतात गेल्या दहा दिवसांपासून कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. ब्रिटनची राजधानी लंडन मध्येही या शेतकरी आंदोलनाचे पडसाद रविवारी पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ब्रिटनमध्ये रविवारी भारतीय दुतावासाबाहेर मोठे आंदोलन करण्यात करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली तसेच खलिस्तानवादी झेंडेही फडकले. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यानंतर या आंदोलनाबाबत ब्रिटनच्या लंडनस्थित भारतीय उच्चायोगाने स्पष्टीकरण दिलं आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये निदर्शक खलिस्तानी ध्वज फडकावताना दिसत आहेत. निषेधात सहभागी काही लोक मोदी सरकारचे घोषणाबाजी करत आहेत.एएनआयच्या माहितीनुसार, या आंदोलनात खलिस्तानी झेंडे फडकवण्यात आले तसेच शेतकऱ्यांच्या समर्थनाबरोबरच भारतविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली. भारतीय उच्चायोगाने सांगितलं की, “कोरोना महामारीदरम्यान भारतीय उच्चायोगासमोर ३५०० ते ४००० लोक सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन करत एकत्र आले. सुमारे ७०० वाहनं या रॅलीमध्ये सहभागी झाली होती. उच्चायोगाला याची माहिती होती की, लंडन पोलिसांनी ३० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्याची परवानगी दिली नव्हती तसेच या आंदोलनासाठी ४० वाहनांची परवानगी घेण्यात आली होती.
#WATCH: ‘Khalistani’ flags at a protest opposite Indian High Commission, London. The protest was to be against Indian farm laws. https://t.co/YeOWlFwokj pic.twitter.com/Ez5GF3MxzA
— ANI (@ANI) December 6, 2020
स्पष्टीकरण देताना उच्चायोगाने आंदोलक कोण होते आणि त्यांची मागणी काय होती? याबाबतही सांगितले आहे. ” हे विभाजनवादी आणि भारतविरोधी लोक होते. जे शेतकरी आंदोलनाआडून आपला भारतविरोधी अजेंडा पुढे नेऊ पाहत होते. कृषी कायद्यांविरोधात भारतात सुरु असलेले आंदोलन हा लोकशाहीचा भाग आहे. यावर भारत सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत आहे. त्यामुळे हे सांगण्याची गरज नाही की हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे.”
भारताच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या निषेधानंतर यूके, यूएसए आणि कॅनडामध्ये वारंवार निषेध होत आहेत. या कारणास्तव, भारतीय दूतावासाने देखील सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली. त्यानंतर रविवारी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या विनंतीवरून लंडन पोलिसांनी भारतीय दूतावासाची सुरक्षा अधिक कडक केली. लंडनमधील भारतीय दूतावासात स्कॉटलंड यार्डमधील अतिरिक्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, या मोठ्या आंदोलनाची ब्रिटनच्या परराष्ट्र आणि गृह विभागाने याची दखल घेतली आणि गर्दीवर नियंत्रण मिळवलं. यावेळी काही समाजकंटकांना ताब्यातही घेण्यात आले. उच्चायोगाने सांगितलं की, ते या प्रकरणावर बारीक नजर ठेवून आहे. विनापरवानगी इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्रित कसे झाले यासह इतर पैलुंची चौकशीही केली जात आहे.