१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु; फक्त ‘या’च वेळेत करता येणार प्रवास
बातमी मुंबई

१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु; फक्त ‘या’च वेळेत करता येणार प्रवास

मुंबई : गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेली मुंबई लोकल अखेर सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र 1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विशिष्ट वेळांच्या मर्यादेत मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीत सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्यासाठी गर्दी होणार नाही आणि आरोग्याचे नियम पाळले जातील, याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते.

त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांना यातून प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल. मुंबई व उपनगरातील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणे करून सर्वाना सुविधा उपलब्ध होणार असल्याचे म्हंटले आहे. याच बरोबर सर्वसामान्य प्रवाश्यांना प्रवासासाठी काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

यानुसार, सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. तर सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.