तर शेतकरी संसदेला घेराव घालणार; आजच्या केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरीकडे सर्वांचे लक्ष
देश बातमी

तर शेतकरी संसदेला घेराव घालणार; आजच्या केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरीकडे सर्वांचे लक्ष

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. देशभरातून शेतकऱ्यांना पाठींबा मिळत आहे. गेल्या आठ दिवसात चार वेळा केंद्र सरकारची चर्चा होऊनही आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून सरकारसोबत चारवेळा चर्चा फिस्कटल्या नंतर आता शेतकऱ्यांनी संसदेला घेरण्याचा इशारा दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या आठ दिवसांत केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये आतापर्यंत चार वेळा चर्चा झाली. मात्र कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यानंतर आज दुपारी दोन वाजता केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी होणार आहे. या बैठकीत सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही, तर संसेदला घेराव घालू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

आज होणाऱ्या बैठकीसंदर्भात पंतप्रधानांसोबत चर्चा केली जाणार असून, त्यानंतर शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्य मंत्री पियूष गोयल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी दाखल झाले आहेत. त्यामुळे पाचव्या फेरीत तोडगा निघतो की, शेतकऱ्यांचे आंदोलन असेच पुढे चालु राहणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, कृषी क्षेत्र अधिक खुले करण्याचा दावा करत मोदी सरकारनं तीन कृषी कायदे केले. मात्र या कायद्यांना शेतकऱ्यांनी याला कडाडून विरोध केला.आधी राज्याराज्यात शेतकऱ्यांनी आंदोलनं सुरू केली. मात्र, सरकारकडून दखल घेतली जात नसल्यानं शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली होती. दिल्लीत आंदोलनासाठी दाखल होण्याआधीच शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर रोखण्यात आलं. गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत.

केंद्र सरकारनं तीन्ही काळे कायदे मागे घेत किमान हमीभाव देण्यावर लिखित आश्वासन द्यावं. आजच्या चर्चेत काही तोडगा निघाला नाही तर राजस्थानातूनही शेतकरी राष्ट्रीय महामार्ग ८ वरून दिल्लीकडे कूच करतील. अशा इशारा किसान महापंचायतचे अध्यक्ष रामपाल जाट यांनी दिला आहे. तर ”आज दुपारी २.०० वाजता शेतकऱ्यांसोबत बैठक होणार आहे. शेतकरी सकारात्मक पद्धतीनं विचार करत आपलं आंदोलन मागे घेतील अशी मला आशा आहे. असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केला आहे.