यशोमती ठाकुरांच्या नाराजीवर संजय राऊतांचा राजकीय सल्ला; म्हणाले…
राजकारण

यशोमती ठाकुरांच्या नाराजीवर संजय राऊतांचा राजकीय सल्ला; म्हणाले…

मुंबई : “आम्हीसुद्धा अनेकदा पवारांचं मार्गदर्शन घेतो. मुख्यमंत्री घेतात. ते सुद्धा शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. दांडगा अनुभव शरद पवारांचा असेल, तर सगळ्यांनी आपला अंहकार आणि इगो विसरून आपल्यापेक्षा ज्येष्ठ नेता आपल्याला काही सांगत असेल, तर आपण त्या भूमिकेत शिरायला पाहिजे.” असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानानं महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्या आणि यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली. “हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं,” असा इशाराच महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी शरद पवारांचं नाव न घेता मित्रपक्षांच्या नेत्यांना दिला होता.

या नाराजीवर संजय राऊत यांनी कॉंग्रेसला राजकीय सल्ला दिला आहे. “राहुल गांधी हे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, पण ते काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत. त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं आणि कामाला लागावं या मताचा मी आहे. सातत्यानं काही लोक असं बोलत असतील, काँग्रेसनं चिंतन केलं पाहिजे. मी त्यांच्या पक्षाविषयी बोलू शकतो. पण मला असं वाटतं की, काँग्रेसला राहुल गांधींशिवाय पर्यायचं नाही. राहुल गांधींच्या नेतृत्वाला तडे जावेत. त्यांचं प्रतिमाभंजन व्हावं, यासाठी भाजपाकडून कसोशीने प्रयत्न केले जातात. त्यांचं नेतृत्व उभंच राहू नये. राहुल गांधी कुठेही मेहनतीत कमी पडत नाहीत. त्यांना नशीब आणि भाग्य साथ देत नाही,” असं म्हणत राऊत यांनी काँग्रेसला चिंतन करण्याचा सल्ला दिला.

संजय राऊत पुढे म्हणाले की, ”“राहुल गांधी यांच्या बाबतीत अशी विधान वारंवार होत असतात. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा मी सगळ्यात मोठा समर्थक आहे. सगळ्यांनाच नरेंद्र मोदी होता येणार नाही. सगळ्यांना शरद पवार होता येणार नाही. प्रत्येकाच्या नेतृत्वाच्या आपल्या मर्यादा असतात. मोदींच्याही आहेत. अशा वेळेला ज्या सातत्याविषयी शरद पवार बोलत आहेत. मला असं वाटतं की, शरद पवारांची जी भूमिका आहे, शरद पवारांचं सांगणं, हे त्यांच्यापेक्षा अनुभवानं कमी असलेल्या कुणीही फक्त राहुल गांधीच नाही, तर कुणीही मार्गदर्शन म्हणून स्वीकारायला हवं. ते जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांचा एक अभ्यास असतो.”