आघाडी सरकारमध्ये एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहावं लागतं – अजित पवार
राजकारण

आघाडी सरकारमध्ये एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहावं लागतं – अजित पवार

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. आघाडी सरकार चालवत असताना निर्णय होत नाही तोपर्यंत सर्वांनी भूमिका मांडायची असते, पण एकदा निर्णय झाला की सर्वांनी समाधानी राहायचं असतं, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. यातून त्यांनी प्रभाग रचनेवरुन नाराजी व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अजित पवार यांनी यावेळी राज्यातील पूरस्थितीवरही भाष्य केलं. तसेच जिथं पाणी आहे आणि पोहचणं शक्य नाही तिथं ड्रोनने पाहणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पवार म्हणाले, आघाडी सरकार चालवत असताना निर्णय झाल्यावर नेहमी समाधानी राहायचं असतं. त्यात पुन्हा एकदा वेगळं वक्तव्य करुन कारण नसताना गैरसमज पसरायचे नसतात, असं माझं मत आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सर्वजण आपली भूमिका प्रकर्षाने मांडत असतात. परंतू निर्णय घेतला की त्या निर्णयाचं समर्थनच आम्ही करत असतो. त्यामुळे हा त्रिसदस्यीय प्रभाग रचना निर्णय आता महाविकासआघाडी सरकारचा निर्णय झाला आहे. आता त्याची अंमलबजावणी राज्यात होईल.

काँग्रेसच्या प्रांतअध्यक्षांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. काँग्रेसच्या वतीने विधीमंडळात बाळासाहेब थोरात नेते आहेत. कॅबिनेटला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण व इतर मान्यवर देखील होते. आम्ही राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि इतरजण होते. त्यामुळे याबाबत लगेच काही आकाशपाताळ कोसळलं आहे असं समजण्याचं कारण नाही, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.