महाविकास आघाडीत धूसफूस? कॉंग्रेस नेत्याचे सोनियांना पत्र
राजकारण

महाविकास आघाडीत धूसफूस? कॉंग्रेस नेत्याचे सोनियांना पत्र

मुंबई : महाविकास आघाडीत धूसफूस सुरु असल्याचे सातत्याने समोर येत असतानाच मुंबईतील कॉंग्रेस कमेटीचे महासचिव विश्वबंधु राय यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहून राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल तक्रार केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सारं काही अलबेल नसल्याची चर्चा आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आमचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस हा जाणिवपूर्वक, रणनिती बनवून कॉंग्रेसला नुकसान पोहोचवतोय. ते आपल्या पक्षाला पुढे नेण्याच्या मागे लागलेयत असे विश्वबंधु राय यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत दिल्या गेलेल्या आश्वासनांवर काम होत नसून पक्षामधील पदाधिकाऱ्यांच्या गळतीवर ठोस पावलं उचलायला हवीत असे देखील त्यांनी या पत्रात पुढे म्हटलंय.

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. यामध्ये कॉंग्रेस पार्टी ही केवळ सहयोगी पक्ष म्हणून काम करत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना हेच सरकार चालवण्याच्या भूमिकेत आहेत. कॉंग्रेसचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना कॉंग्रेसची वोट बॅंक आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.