औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावरून शरद पवारांचे मोठे विधान;  म्हणाले…
राजकारण

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावरून शरद पवारांचे मोठे विधान; म्हणाले…

मुंबई : ”आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. या विषयाकडे मी गांभीर्यानं पाहत नाही,’ असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात औरंगाबादसाठी संभाजीनगर, तर उस्मानाबादसाठी धाराशिव नाव वापरण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना विरुद्ध काँग्रेस सामना पाहायला मिळत आहे. आता या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सीएमओच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर आणि उस्मानाबादसाठी धाराशिव केल्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी ट्विट करत माहिती व जनसंपर्क विभागाला बजावलं होतं. मात्र त्यानंतरही CMO च्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विधानात संभाजीनगर म्हटल्यानं सीएमओनं तोच शब्द ट्विटमध्ये वापरला होता.

तर दोनच दिवसांपूर्वी सीएमओनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा केला. त्यामुळे शिवसेनेकडून नामांतराचा मुद्दा रेटला जात असताना आणि काँग्रेसकडून त्याला विरोध होत असताना शरद पवार यांनी यावर अगदी मोजक्या शब्दांत भाष्य केलं. ”आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. या विषयाकडे मी गांभीर्यानं पाहत नाही,” असं त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करत असल्यानं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली. औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा असलेला विरोध कायम असल्याची भूमिका मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली. त्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबादला संभाजीनगरच म्हणणार असल्याचं ठणकावून सांगितलं. ‘मी नवीन काय केलंय? आतापर्यंत मी जे बोलत आलोय, बाळासाहेब जे बोलत आलेत, तेच मी बोलतोय, तेच करतोय आणि पुढेही तेच करणार. औरंगजेब सेक्युलर नव्हता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या सेक्युलर अजेंड्यात औरंगजेब बसत नाही,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.