पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्य सरकारने संजय राठोड यांच्यावर यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने भाजपाने आक्रमक भूमिका घेत आज पनवेलमध्ये आंदोलन केलं. पनवेल माहनगरपालिकेच्या महापौर कविता चौतमोल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये कळंबोली येथे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतलं.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
महापौर कविता चौतमोल यांच्यासह सभापती मोनिका महानवर आणि इतर नगरसेविकांसहीत भाजपाच्या अनेक महिला कार्यकर्त्यांनी आज कळंबोली येथे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी करत आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी, ‘शरद पवार, जागे व्हा’ अशा घोषणा देत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. कळंबोली येथील मॅकडोनाल्ड समोरील महामार्ग रोखण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. कळंबोली पोलिसांनी वेळीच धाव घेऊन महापौर चौतमोल यांच्यासह महिला व पुरुष अशा ३५ आंदोलकांना ताब्यात घेतले. मार खावा लागला तरी आम्ही हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.
इतकेच नव्हे तर, विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात या प्रकरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची भाजपची रणनीती आहे. त्यामुळे पूजा चव्हाणचे हे प्रकरण विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारसाठी त्रासदायक ठरू शकते, हे लक्षात घेऊनच वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असा सूर सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनेही तसेच मत व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे, वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजप ठाम आहे. सत्ताधारी शिवसेना राठोड यांना पाठीशी घालीत असल्याचा आरोप भाजपकडून के ला जातो. राठोड हे अधिवेशनात मंत्रिपदी कायम राहिल्यास विरोधकांना महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याची आयतीच संधी मिळणार आहे.