वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलबाबत बीसीसीआयचं स्पष्टीकरण
क्रीडा

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलबाबत बीसीसीआयचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. अशात आयपीएल स्पर्धेचे पुढे काय होणार हा प्रश्न उद्भवत असताना उर्वरित सामने होणारच असल्याचे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. बीसीसीआयनं एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आयपीएल स्पर्धा सुरुच राहणार आहे. कोणीही सोडून गेलं तरी काही हरकत नाही, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं असल्याचे वृत्त वृत्तसंस्थेकडून देण्यात आले आहे. एक एक करुन परदेशी खेळाडू भारत सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर वानखेडे मैदानातील १० कर्मचारी आणि बीसीसीआयने स्पर्धेसाठी नेमणूक केलेल्या ६ सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे देशातील कोरोना स्थिती पाहता खेळाडूंच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. त्यानंतर स्पर्धा होणारच असल्याचे स्पष्टीकरण बीसीसीआयने दिले आहे.

आयपीएल स्पर्धेसाठी बायो बबल तयार केला आहे. मात्र भारतातील कोरोना स्थिती पाहता खेळाडू चिंतेत आहेत, असं कोलकाता नाइटराइडर्सचा मेंटॉर डेविड हसी याने सांगितलं आहे. ऑस्ट्रेलिया स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर आपल्या खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानाची सोय करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचे १४ खेळाडू अजूनही स्पर्धेत खेळत आहेत. या व्यतिरिक्त प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग, सायमन कॅटिच, समालोचक मॅथ्यू हेडन, ब्रेट ली, मायकल स्लेटर आणि लीजा स्टालेकर आहेत.