राजेश टोपेंच जनतेला आवाहन; कोरोना नियम पाळा, अन्यथा…
कोरोना इम्पॅक्ट

राजेश टोपेंच जनतेला आवाहन; कोरोना नियम पाळा, अन्यथा…

मुंबई : राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याने काही भागात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला नियमांचं पालन करण्याचे आवाहन केले आहे. “वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. पण राज्यातल्या जनतेने नियमांचं पालन करून सहकार्य करावं”, असं आवाहन राजेश टोपेंनी राज्यातल्या जनतेला केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी आहे. पण जनतेनं काळजी घेणं आवश्यक आहे. संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात असून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे.

दरम्यान, राजेश टोपेंनी नागरिकांना खबरदारीचं आवाहन केलं आहे. “लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात असून नागरिकांनीदेखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंध नियमांचा वापर नागरिकांकडून झाल्यास रुग्णसंख्येला आळा घालू शकतो. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्याकरिता निर्बंधांचे पालन करावे”, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यात लसींचा तुटवडा नसल्याचं राजेश टोपेंनी यावेळी स्पष्ट केलं. ““राज्यात बाधीत होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 85 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यातील बहुतांश जणांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, राज्यामध्ये लसीचा तुटवडा नसून खासगी व शासकीय रुग्णालयात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत.

राज्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली असून दररोज किमान सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. त्याचबरोबर ६० वर्षांवरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करुन घ्यावे”, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेल, उपहारगृहांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना ‘नियम पाळा, कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका’, असा इशारा दिला होता. राज्यातील रुग्णसंख्या आणि बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. देशात सर्वाधित ८६ टक्के नवे कोरोनाबाधित ७ राज्यांमध्ये सापडत असून त्यामध्ये सर्वाधित सरासरी ५० टक्के बाधित एकट्या महाराष्ट्रात सापडत आहेत. या पार्श्वभूीवर सरकारी पातळीवर खलबतं सुरू असून राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोनासंदर्भातले निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत.”