मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी’ ‘या’ मुद्द्यांवर होणार युक्तिवाद
बातमी महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी’ ‘या’ मुद्द्यांवर होणार युक्तिवाद

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात आज (ता. ९) मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. राज्य सरकारच्या मागणीनुसार मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली आहे. आज, 9 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, नायायालयात आज होणाऱ्या युक्तिवादाचे एक्सक्लुझिव्ह डिटेल्स एबीपी माझाला मिळाले आहे. त्यानुसार एबीपी माझाने आज होणाऱ्या युक्तिवादाबाबत वृत्त प्रसिध्द केले आहे. मुकुल रोहतगी, पीएस पटवालिया, कपिल सिब्बल हे वकील राज्यसरकारच्या वतीने तर अभिषेक मनु सिंघवी हे याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या वतीने बाजू मांडतील.

आजच्या युक्तिवादात मराठा आरक्षणाची स्थगिती तातडीने उठवण्यात यावी ही मुख्य मानाग्नी केली जाणार आहे. त्यानंतर तीन मुद्द्यांवर युक्तिवाद केला जाणार आहे. यातील पहिला मुद्दा म्हणजे, नऊ सप्टेंबरला स्थगितीचा निर्णय देण्याआधी 2225 शासकीय पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती त्यांना फक्त ऑर्डर देणे बाकी राहिलं होतं. दुसरा मुद्दा, 3800 जागांची भरतीप्रक्रिया या निर्णयामुळे अधांतरी आहे. तर तिसरा मुद्दा म्हणजे, स्थगिती देताना या शैक्षणिक वर्षापुरती मराठा आरक्षणाला स्थगिती असं कोर्टाने म्हटलं होतं तर या वर्षापुरती सुपर न्युमररी पद्धतीने शैक्षणिक प्रवेश करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राज्यसरकारकडून केली जाणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीने घटनापीठाची स्थापन करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने 20 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात चार फेरविचार याचिका दाखल केल्या होत्या. पहिला अर्ज 7 ऑक्टोबर, दुसरा 28 ऑक्टोबर, तिसरा 2 नोव्हेंबर आणि चौथा अर्ज 18 नोव्हेंबर रोजी दाखल केला होता.

त्याचबरोबर 5 सदस्यीय घटनापीठासमोर होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली होती. चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या समन्वय समितीमध्ये अॅड. आशिष गायकवाड, अॅड. राजेश टेकाळे, अॅड. रमेश दुबे पाटील, अॅड. अनिल गोळेगावकर व अॅड. अभिजीत पाटील यांचा समावेश आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी आज होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक व संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांनी समन्वय समितीतील सदस्यांशी संपर्क साधावा. ही समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्याबाबत राज्य शासनाच्या वकिलांना माहिती देईल, असं सांगण्यात आलं होतं.