नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या नाना पटोले यांच्या गळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली आहे. प्रदेशाध्यपदी काँग्रेस नाना पटोले यांची नियुक्ती झाल्याने तर्कविर्तकांना पूर्णविराम मिळाला आहे. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचं नावं प्रदेशाध्यपदासाठी निश्चित झाल्याचं मानलं जात होतं.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
२०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून नाना पटोले यांनी भाजपाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक जिंकली. पण पाच वर्षाच्या आताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली होती. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढत त्यांनी विजय संपादित केला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आले. महाआघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
मागील काही दिवसांपासून काँग्रेस राज्यातील नेतृत्व बदलणार असल्याची चर्चा होती. नव्या नेतृत्वाची चाचपणी करण्यासाठी दिल्लीतून काँग्रेसनं राज्यात प्रतिनिधीही पाठवले होते. यात अनेक नावं स्पर्धेत होती. काँग्रेसमध्ये अनेक वरिष्ठ नेते असल्यानं त्यांना सांभाळून घेणारं नेतृत्व निवडण्याचं आव्हान काँग्रेससमोर होतं. महत्त्वाचं म्हणजे एकेकाळी गढ असलेल्या विदर्भात काँग्रेस कुमकुवत झाली असून, पुन्हा पाय रोवण्यासाठी विदर्भाकडे प्रदेशाध्यक्षपद दिल्याचं बोललं जात आहे.
INC COMMUNIQUE
Important Notification regarding appointment of Maharashtra PCC President, Working Presidents, Parliamentary Board of Maharashtra PCC and Strategy Screening and Coordination Committee pic.twitter.com/bkQSendfgL
— INC Sandesh (@INCSandesh) February 5, 2021
नाना पटोले यांच्याबरोबर त्यांच्या मदतीला सहा कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहमद आरिफ नासीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर प्रदेश उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसैन दलवाई, मोहन जोशी, रणजित कांबळे, कैलास गोरंट्याल, बी. आय. नगराळे, शरद अहेर, एम. एम. शेख आणि माणिक जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.