सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे : संजय राऊत
राजकारण

सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे : संजय राऊत

मुंबई : ”महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.” असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. सचिन वझे प्रकरणी महाविकास आघाडी सरकार समोरच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची बदली केल्यानंतर सिंह यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवलं. या पत्रात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. या पत्राने राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊत यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या पत्राची खातरजमा केली जात असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी सरकारमधील सर्व घटकांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्य सरकारवर शिंतोड उडाले आहेत. त्यामुळे आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवं. सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पोलीस खाते हे राज्याचा कणा असतो. स्वाभिमानाचे प्रतिक असते. हा कणा राज्यकर्त्यांनी मजबूत ठेवायचा असतो. सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करावं लागेल,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, “परमबीर सिंह हे माजी पोलीस आयुक्त होते. ते एक उत्तम अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत उत्तम सेवा बजावली आहे. मात्र, परमबीर सिंह यांनी पत्रात लिहलेल्या गोष्टींची सत्यता पडताळावी, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ही सत्यता पडताळून पाहतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायम सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गोष्टी घडल्या. या सगळ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच, विरोधी पक्षाच्या मागणीवर सरकार चालत नाही किंवा सरकारमध्ये उलथापालथ होत नाही. मी चहाला उधार नाही, पण या पत्राने सरकारवर शिंतोडे उडवले ही बाब मी मान्य करतो. हे सरकार स्थापन करण्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या पण सरकारबाहेर असणाऱ्या माझ्यासारख्या हितचिंतकांसाठी ही धक्कादायक गोष्ट आहे, असही संजय राऊत यांनी म्हंटल आहे.