पंतप्रधानांचा ‘तो’ शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही:  अशोक चव्हाण
राजकारण

पंतप्रधानांचा ‘तो’ शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही: अशोक चव्हाण

मुंबई : “पंतप्रधानांचा ‘आंदोलनजीवी’ हा शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही. या शब्दातून आंदोलनावर जगणारा असा अर्थ ध्वनीत होतो. हा उपरोधिक शब्द शेतकरी आंदोलनाबाबत वापरला गेला. पण शेतकरी हा कोणताही ‘जीवी’ नाही, तर मानवतेला ‘जीवि’त ठेवणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांचा असा अवमान करणे निंदनीय आहे”, असं ट्विट करत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर जोरदार शरसंधान केलं. यावेळी मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य करत देशात सध्या आंदोलनजीवी जमातीची पैदास झाल्याचं म्हटलं. यावर अशोक चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, पंतप्रधानांनी वापरलेला आंदोलनजीवी शब्द अजिबात स्वीकारार्ह नसल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. अशोक चव्हाण यांनी मोदींच्या भाषणानंतर एक ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी

“श्रमजीवी, बुद्धिजीवी यांसारखे शब्द आपल्या खूपच परिचयाचे आहेत. मात्र, मी पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी. वकिलांचं, विद्यार्थ्यांचं, कामगारांचं कुणाचंही आंदोलन असेल हे आंदोलनजीवी सर्व ठिकाणी उपस्थित असतात. हे कधी पडद्यामागे तर कधी पडद्याच्या पुढेही असतात. यांची एक टोळी आहे. हे लोक आंदोलनांशिवाय जगू शकत नाहीत तसेच आंदोलनासोबत जगण्यासाठी ते मार्ग शोधत असतात, आपल्याला अशा लोकाना ओळखायला हवं.” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या नेत्यांवर, राजकीय पक्षांवर टीका केलील आहे.

दरम्यान, केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. देशभरातून कृषी कायद्यांना विरोध होत असून शेतकऱ्यांसह विरोधकांकडूनही हे कायदे रद्द करण्याची मागणी केली जात आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध आंदोलनांना पाठिंबा दर्शवणाऱ्या आणि आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या नेत्यांवर, राजकीय पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडकून टीका केली.