कोकणात शिवसेनेला धक्का; शिवसैनिकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

कोकणात शिवसेनेला धक्का; शिवसैनिकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

रत्नागिरी : कोकणात नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आज शेकडो शिवसैनिकांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करत स्थानिक रत्नागिरीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवसेना पक्षाकडून नाणार रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या लोकांचे दडपशाहीने निलंबन करण्यात येत होते. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी खदखद पाहायला मिळत होती. त्यामुळे शिवसेनेत दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. एका गटाने नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले आहे. तर दुसरा गट रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधी भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे. याच वादातून रत्नागिरी रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. प्रकल्पाच्या बाबतीत समर्थनाची भूमिका घेतलेले शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तारळ, कुंभवडे, अणुसुरे आणि मिठगवाणेमधील शिवसेना कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहे.

रिफायनरीला समर्थन केल्याने शिवसेनेतून हकालपट्टी झालेले नाणारचे विभाग प्रमुख राजा काजवे देखील भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात होते. नाणारचे उपविभाग प्रमुख सुहास कुवरे देखील भाजपचा झेंडा हाती धरणार आहेत. तसंच, कोकण जनकल्याण प्रतिष्ठान अध्यक्ष पंढरीनाथ आंर्बेरकर यांचा सुद्धा समावेश असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.