भाजपमधून कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार?
राजकारण

भाजपमधून कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार?

मुंबई : ”काँग्रेस पक्षाचा विचार हा शाश्वत विचार असून तोच देश हिताचा आहे. सध्या देशात असलेले भाजपा-आरएसएस विचाराचे सरकार देशहिताचे नसून समाजात तेढ निर्माण करणारे आहे. पुन्हा एकदा राष्ट्र निर्माणासाठी मोठे कार्य करावे लागणार आहे. असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी शेकडो समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, ”भाजपमधून मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार असून भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षाला लागलेली गळती पाहून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी, भाजपातून कोणीही जाणार नाही असा खोटा दावा देवेंद्र फडणवीस यांना करावा लागत आहे.

कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत एक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे, हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा घातला आहे पण केंद्र सरकारकडे सहानुभूती नाही, त्यांची भूमिका क्रूर व अडेलतट्टूपणाची आहे. केंद्रातील सरकारने गरीब माणसाला ताकद देणारे कामगार हिताचे कायदे बदलण्याचे काम केले आहे. काही मूठभर लोकांसाठी, साठेबाज लोकांसाठी कृषी कायदे केले आहेत. शेतकरी मूलभूत प्रश्न विचारत आहेत परंतु केंद्र सरकार उत्तर द्यायला तयार नाही.

दरम्यान, आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले, माजी जिल्हा परिषद सदस्य, अगस्ती साखर कारखान्याचे संचालक मिनानाथ पांडे, बुवासाहेब नवले पतसंस्थेचे उपाध्यक्ष, माजी पंचायत समिती सदस्य रमेश जगताप आदि नेत्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत गांधी भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.