मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय उद्यापर्यंत घेऊ; शरद पवार
राजकारण

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय उद्यापर्यंत घेऊ; शरद पवार

मुंबई : परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप हे गंभीर आहेत. या प्रकरणाचे राज्यात पडसाद उमटत असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. त्यामुळे याबाबत उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय घेऊ, असं शरद पवार यांनी म्हंटल आहे. या प्रकरणी उद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून या प्रकरणाच्या चौकशीचे सर्वाधिकार आणि निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असेल, असंही यावेळी परावाणी सांगितलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शरद पवारांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर भाष्य करत भूमिका मांडली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन बदली केल्यानंतर त्यानी गृहमंत्र्यांवर आरोप केले आहेत, आयुक्त पदावर असताना नाही. परमबीर सिंह यांच्याशी माझी भेट झाली होती. पण, त्यांनी फक्त त्यांच्या बदलीबद्दल म्हणणं मांडलं होतं. त्याचबरोबर माझ्या खात्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचं म्हटलं होतं. त्यापलीकडे त्यांनीही मला काहीही सांगितलं नाही.

शरद पवार पुढे म्हणाले की, परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर आरोप करणारे जे पत्र दिले आहे, त्यावर परमबीर यांचे हस्ताक्षर नाही. तसेच, गृहमंत्र्यांनी मागणी केलेले हे 100 कोटी रुपये नेमके कोणाला द्यायचे, कुणाकडं गेले ते या पत्रात नमूद केलं नाही. वाझे यांना सेवेत परत घ्यायचा निर्णय हा परमबीर सिंह यांचाच होता. वाझेंच्या नियुक्तीचा निर्णय हा गृहमंत्र्यांचा नव्हता.”

त्याचप्रमाणे, देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर ते पत्र समोर आलं. हे संपूर्ण प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनत आहे. त्यामुळे याची एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी. राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे. याचा कोणताही परिणाम सरकारवर होणार नाही,” असं पवारांनी स्पष्ट केलं.