पुढील सुनावणीपर्यंत सरकार मराठा समाजातील मुलांसाठी काय करणार? संभाजी राजे भोसलेंचा सवाल
राजकारण

पुढील सुनावणीपर्यंत सरकार मराठा समाजातील मुलांसाठी काय करणार? संभाजी राजे भोसलेंचा सवाल

नवी मुंबई : ”मराठा समाजातील मुलाचं फार नुकसान होतंय. मुलांमध्ये आक्रोश निर्माण होतोय. तोपर्यंत इतर माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल. हे सरकारनं युद्धपातळीवर निर्णय घ्यावा.” अशी विनंती छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. तसेच, आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या निर्णयावरून राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. तसेच, आम्ही कोणतीही भरती थांबवण्यास नकार दिलेला नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. मात्र या अॅक्ट अंतर्गत ही भरती करता येणार नाही असं कोर्टाने म्हटलं आहे.

तर, मराठा आरक्षणाच्या स्थगितीचा परिणाम सरकारी नोकरभरती होत असल्याचं मराठा आरक्षण याचिकाकर्त्यांनी सांगितलं असता आम्ही राज्य सरकारला नियुक्या करण्यापासून थांबवलेलं नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मात्र नियुक्त्या करताना या कायद्यात करु नये; असं कोर्टानं म्हटलं आहे.

पाच सदस्यीय घटनापीठाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला. त्यामुळे राज्य सरकारच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली. “माझी सरकारला विनंती आहे, मुलांचं फार नुकसान होतंय. मुलांमध्ये आक्रोश निर्माण होतोय. त्यांना पुढे काय करायचं कळत नाहीये. तोपर्यंत इतर माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल. हे सरकारनं युद्धपातळीवर निर्णय घ्यावा, अशी मी विनंती करतो. मराठा समाजाच्या लढाईपेक्षा हा न्यायप्रविष्ट विषय आहे. २५ जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय होईल किंवा अंतिम सुनावणी होऊन निर्णय येईल,” असं संभाजीराजे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की “मी असं म्हणणार नाही की, रोहितगी आणि इतरांनी आपली बाजू चांगली मांडली नाही, असं मी म्हणणार नाही. रोहितगींसह सर्व सहकाऱ्यांनी जोमाने बाजू मांडली. पण बाजू मांडत असताना पुढची तारीख का मागितली हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाला समजला नाही. पुढची तयारी करायची म्हणून पुढची तारीख मागितली का? दुसऱ्या कुठल्या विषयासाठी मागितली हे मला काही कळालं नाही. पण तोपर्यंत सरकार या मुलांसाठी काय करणार आहे. काय मदत देणार आहे, हे सरकारनं सांगावं.”

तसेच, आज महाविद्यालये सुरू झाली आहेत. ही सुनावणी पुढे किती दिवस चालणार माहिती नाही. माझ्या डोळ्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारने भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. कालही ते सकारात्मक दृष्टिकोनातून माझ्याशी बोलले. मोठेपण दाखवत स्वतःहून फोन करून चर्चा केली. सगळं मान्य आहे, पण पुढे काय करायचं हे सरकारनं सांगावं,” असं सांगत संभाजीराजेंनी सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलं आहे.