टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची घोषणा
क्रीडा

टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषण करण्यात आली आहे. पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर यांना यामधून वगळण्यात आले आहे. सलामीवीर शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांनाही अनपेक्षित डच्चू मिळाला आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या १५ सदस्यीय संघात अनुभवी रविचंद्रन अश्विनसह पंचतारांकित फिरकी माऱ्याची रचना करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यंदा १७ ऑक्टोबरपासून अमिराती आणि ओमान येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी शार्दूल आणि श्रेयस यांची राखीव खेळाडू म्हणून वर्णी लागली आहे. शार्दूलने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने या कसोटीच्या दोन्ही डावांत अर्धशतके झळकावली आणि गोलंदाजीतही छाप पाडताना दुसऱ्या डावात रॉरी बर्न्‍स आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूटचा अडसर दूर केला. मर्यादित षटकांच्या देशांतर्गत क्रिकेटमधील पृथ्वीची गेल्या वर्षभरातील कामगिरी लक्षवेधी होती. आयपीएलमध्ये दुखापत झालेल्या आक्रमक श्रेयसची कामगिरी निवड समितीचे लक्ष वेधू शकली नाही.

त्याचबरोबर, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघाच्या मार्गदर्शकाच्या (मेंटॉर) भूमिकेत दिसणार आहे. दोन विश्वचषक विजेत्या धोनीने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. मात्र, तो पुन्हा भारतीय संघाशी जोडला जाणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकात धोनी भारतीय संघाच्या मार्गदर्शकाची जबाबदारी पार पाडेल.

भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर