अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा; अन्यथा लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल…
कोरोना इम्पॅक्ट

अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा; अन्यथा लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल…

पुणे : ”राज्यातील अनेक शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आल्यानं लॉकडाउन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील आठ दिवसात रुग्णसंख्या आणि कोरोना वाढला तर लॉकडाउनचा निर्णय घेण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे कळकळीचं आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. न्हावा शेवा टप्पा-३ योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “राज्यात करोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला लागला आहे. दररोज रुग्णांची वाढतेय. सावध राहायला हवं. मास्क वापरायला हवा. शहरात लॉकडाउनची वेळ येणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. एकदा लॉकडाउन केल्यानंतर संपूर्ण अर्थव्यवस्थेची घडी विस्कटून जातेय, हे आपण पाहिलं आहे. दिवसभर काम केल्यानंतर ज्यांची संध्याकाळी चूल पेटते, त्यांची तर एवढी बिकट अवस्था होतेय. कसं जगायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होतो. लोकांचं करोनाबद्दलचं गांभीर्य निघून गेलंय. कृपा करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ देऊ नका, हेच मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं आहे,” असा निर्वाणीचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

“आताच कोरोना तर पूर्ण कुटुंबालाच वेढून टाकतोय. मी हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांनी बोलत होतो. आमचे काही सहकारी अनिल देशमुख, जयंत पाटील, सतेज पाटील, छगन भुजबळ, डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह अनेक मंत्र्यांना कोरोना झाला आहे. संख्या वाढत चालली आहे. यवतमाळ, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये काही कठोर निर्णय घ्यावे लागले. पुण्यातही थोडी कडक भूमिका घ्यावी लागली. प्रशासन व राजकीय प्रतिनिधींशी चर्चा करून रात्रीच्या वेळी कडक भूमिका घेण्यात आली आहे,” असं अजित पवार म्हणाले.